श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षातील दोन महत्त्वाचे पदाधिकारी – तालुका विस्तार प्रमुख सचिन कदम आणि शहर विस्तार प्रमुख लखन कुऱ्हे हे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शिवसेनेच्या संघटनात्मक बळावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सचिन कदम आणि लखन कुऱ्हे हे शिवसेनेत कार्यरत होते. तालुक्यात संघटन विस्तार, स्थानिक समस्या उचलून धरणे, आंदोलने, जनजागृती मोहिमा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचा प्रचार करण्याची जबाबदारी ते काटेकोरपणे पार पाडत होते. दोघांचीही ओळख स्थानिक पातळीवर मजबूत संघटक व तडफदार कार्यकर्ते म्हणून होती. मात्र, काही काळापासून शिवसेनेत अंतर्गत गटबाजी, तालुक्यातील वरिष्ठांकडून होणारी कार्यकर्त्यांची अवहेलना, आणि स्थानिक प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे दोघांच्याही नाराजीला ऊत आला होता. यासोबतच पक्षात कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा संधी अभावी त्यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकत मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर संवाद साधताना सचिन कदम व लखन कुऱ्हे, हे म्हणाले की आमच्या अनुभवाचा व आम्ही केलेल्या आजपर्यंत केलेल्या कामामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला नक्कीच फायदा होईल व येत्या काही काळामध्ये अजून अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसे पक्षांमध्ये प्रवेश करून आणून शहर व तालुक्यात संघटना वाढीसाठी मोठ्या उत्साहाने काम करू असे आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहराध्यक्ष स्वप्नील सोनार, भास्कर सरोदे, विलास पाटणी असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.