राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार असून, या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र आज झालेल्या सुनावणीत खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यासाठी २१ डिसेंबर ही अंतिम तारीख ठरवली.
२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानासोबतच काही नगरपालिकांमध्ये निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. त्यामुळे दोन्ही दिवशी झालेल्या निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील. सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने ३१ जानेवारीपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये आणि उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊ नये, अशीही ठाम भूमिका खंडपीठाने नोंदवली.
दरम्यान, मतमोजणी पुढे ढकलल्याने राज्यातील २८८ ठिकाणच्या निवडणुकींच्या कामकाजावर भार वाढला असून मतदान यंत्रणा दीर्घकाळ सांभाळण्याच्या खर्चाबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाराजी व्यक्त होतेय. अनेक पक्षांनी ३ डिसेंबरलाच निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयीन निकालामुळे आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरकडे लागले आहे.




