श्रीरामपूर – नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी तापू लागली असून प्रभाग क्रमांक २ मध्ये अपक्ष उमेदवार पैलवान अर्जुन दाभाडे यांच्या प्रचाराने आज दमदार सुरुवात झाली. गोंधवणी गावाचे ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मी आई मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील हजारो महिला, पुरुष आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीने आजची प्रचार फेरी जणू शक्तीप्रदर्शनात बदलली.
नारळ फोडताच समर्थकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर उमेदवार दाभाडे यांनी वैदु वाडा, आंबेडकर कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, सेंट बापटीस्ट चर्च आणि वडार वाडा येथे प्रचार दौरा केला. अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करून, पुष्पहार अर्पण करून शानदार स्वागत केले. युवा व स्थानिक उमेदवार असल्याने दाभाडे यांना मिळालेला आजचा प्रतिसाद पाहता निवडणुकीत चुरस वाढणार हे स्पष्ट झाले.दाभाडे यांच्या प्रचार फेरीत एक वेगळेच चित्र दिसले सुसंस्कृत, नम्र आणि विकासाचे आश्वासन देणारी निवडणूक शैली. विरोधकांवर टीका न करता प्रेमाने, सन्मानाने जनतेसमोर आपली भूमिका मांडत दाभाडे यांनी एक आदर्शवत निवडणूक कशी असावी याचे उदाहरण घालून दिले. विशेष म्हणजे दाभाडे यांनी आपल्या विरोधी उमेदवाराच्या घरी भेट देत त्यांना सन्मान दिला आणि मतांची विनंती केली. राजकारणात केवळ संघर्ष नव्हे, तर परस्पर सन्मान किती महत्त्वाचा याचा संदेश त्यांनी दिला.
स्थानिक नागरिक व महिला मंडळींकडून असा सूर ऐकायला मिळाला प्रभागात काम करणारा नेता हवा, भांडणे करणारा नाही.आजच्या प्रचार फेरित दाभाडे यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, विकासाचे प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील दृष्टीकोन नागरिकांसमोर मांडला. प्रभागात स्वच्छ, सकारात्मक आणि सुसंस्कृत निवडणूक पद्धतीची सुरुवात आज पहिल्यांदाच जाणवली. शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय संतापाचे वातावरण पाहायला मिळत असताना, दाभाडे यांच्या शांत आणि सुसंस्कृत प्रचार पद्धतीने प्रभागात एक नवा संदेश गेला.
प्रभाग क्रमांक २ मध्ये आता निवडणुकीची लढत अधिकच रोमहर्षक होणार आहे. दाभाडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे समीकरणांमध्ये बदल होणार हे निश्चित. स्थानिक लोकांचा पाठिंबा, तरुणांचा वाढता उत्साह आणि महिलांचा सहभाग पाहता ही निवडणूक फक्त पक्षांमध्ये नव्हे तर विकास विरुद्ध ढोंगी राजकारण अशी ठरणार असल्याचे संकेत दिसत आहेत. आजचा दिवस दाभाडे यांच्या प्रचाराचा केवळ प्रारंभ नव्हता, तर सुसंस्कृत जनराजकारणाचा एक वेगळा अध्याय असल्याचे शहरात चर्चेत आहे.




