श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विराट सभेने राजकीय वातावरण ढवळून काढले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते व शिवसेना (शिंदे गट) च्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला उसळलेल्या जनसमुदायाने प्रचंड प्रतिसाद दिला.
सभेची सुरुवात संत–महात्म्यांच्या उपस्थितीत झाल्याने मंचाला आध्यात्मिक तेज लाभले. उशीराबद्दल क्षमस्व म्हणत भाषणास प्रारंभ केलेल्या शिंदे यांनी आपल्या कार्यशैलीची आठवण करून देत म्हटले, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अडीच वर्ष झोपलो नाही; विरोधकांची झोप उडवण्यासाठीच जन्मलो आहे. विरोधकांचे नाव न घेता त्यांनी अचूक फटकेबाजी केली फाईव्ह स्टार हॉटेलांतून राजकारण करणाऱ्यांना माझ्या बहिणींनी घरी पाठवलं; म्हणूनच आज त्यांच्या पोटात दुखतंय!
प्रकाश चित्ते यांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, हिंदू मंदिराचा प्रश्न असो किंवा गुंडाचा हैदोस, प्रकाश नेहमी हिंदुत्वाच्या बाजूनेच उभा राहिला. संत महात्म्यांची साथ मिळाली की तो चित्यासारखी झेप घेतो. सभेत शिंदेंनी शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा केली १७८ कोटींची पाणीपुरवठा योजना, प्रवरा डावा कालव्याचे सुरू काम, बाजारपेठेतील तोडलेल्या दुकानांचे संपूर्ण पुनर्वसन, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण, बंदिस्त पाईपलाईनद्वारे प्रदूषणमुक्ती, भुयारी गटार प्रकल्पातील ६५ कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी, समृद्धी महामार्गासाठी श्रीरामपूर कनेक्टर – १५–२० मिनिटांत थेट महामार्गावर मुंबईत म्हटलं आणि करून दाखवलं एकही खड्डा नाही. श्रीरामपूरलासुद्धा तेच करून दाखवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबद्दल बोलताना ते भावनिक झाले व म्हणाले, माझ्या बहिणींना फक्त ₹1500 देऊन थांबणार नाही; त्यांना लखपती करणार. ही फक्त नगरपरिषदेची नाही, श्रीरामपूरच्या भविष्याची निवडणूक आहे. शहराचा काया पालट करण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा. सभेला शिवसेना सचिव राम रेपाळे, संपर्क प्रमुख जनार्दन गालपगार, जिल्हाध्यक्ष नितीन ओताडे, माजी खासदार सदाशिव लोंखंडे, आमदार भानुदास मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, नेते सागर बेग, मंजुश्री मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन देशमुख यांनी सर्व प्रवेशद्वारे, वाहतूक व्यवस्थापन आणि गस्त यांची काटेकोर व्यवस्था केली. सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिंदे यांच्या या सभेनंतर श्रीरामपूरमधील निवडणुकीची हवा बदलल्याचे राजकीय तज्ज्ञ मानत आहेत.




