श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 2 मध्ये जनभावनेची स्पष्ट लाट दिसू लागली आहे. दोन दिवसांत घडलेल्या काही भावनिक घटनांनी स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलत असून, मतदारांनी मल्लू शिंदे यांच्याप्रती दाखवलेला विश्वास प्रभागातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामादरम्यान उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या गरीब कुटुंबांची घरे मल्लू शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून वाचवली होती. त्याच कुटुंबांनी आता त्यांच्या घरी जाऊन ₹10,000 चा चेक देत कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा कोणी नव्हतं, मल्लू भाऊ होते, असे सांगत कुटुंबीय भावूक झाले आणि त्यांच्या समर्थनाची औपचारिक घोषणा केली.
याचबरोबर, प्रभाग 2(अ) मध्ये सौ. रेखा सूर्यभान शेळके यांना दिलेल्या उमेदवारीमुळे मल्लू शिंदे यांचा सामाजिक समतोल आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा संदेश अधिक ठळक झाला आहे. प्रतिष्ठित घराण्याची परंपरा, समाजातील सक्रिय सहभाग आणि महिलांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलता यामुळे रेखा शेळके सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरील वाढता प्रतिसाद, घराघरातील महिलांचा सहभाग, तरुणांच्या संघटनांची उपस्थिती आणि वृद्ध मतदारांचा भावनिक आधार यामुळे प्रभागात ‘जनतेची निवडणूक’ अशी भावना निर्माण होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार प्रभाग क्र. 2 मध्ये मल्लू शिंदे यांच्या बाजूने प्रचंड जनाधार तयार झाला आहे. विश्वास, नातं आणि लोकाभिमुख कामांचा पाया असल्याने मल्लू शिंदे – रेखा शेळके यांची जोडी प्रभागातील सर्वात मजबूत पर्याय ठरत आहे. आगामी दिवसांत या लाटेला अधिक गती मिळणार हे निश्चित मानले जात आहे.




