राहुरी (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले (वय ६५) यांचे आज (दि. १७ ऑक्टोबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः सहकार आणि कृषी क्षेत्रात, एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आमदार कर्डीले हे दोन वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी वर्गाच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बँकेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणत शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लावला. शिक्षण, सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करत आपला ठसा उमटविला होता.
राजकारणातील कामाचा आमदार म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे ते सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. राहुरी, नगर आणि संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी उभारलेले विकासाचे ध्येय आज त्यांच्या आठवणीत जिवंत राहील. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजताच राहुरी, नगर आणि परिसरात शोककळा पसरली. सकाळपासूनच त्यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयात कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले.
आमदार शिवाजी कर्डीले हे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तसेच अक्षय कर्डीले यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक प्रभावी पिढी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आमदार कर्डीले यांच्या पार्थिवावर आज (दि. १७) दुपारी चार वाजता बुन्हानगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम दर्शनासाठी सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आमदार कर्डीले यांच्या निधनाने नगर जिल्हा केवळ एका नेत्याला नव्हे, तर जनतेच्या मनातील खऱ्या अर्थाने “लोकनेता”ला गमावला आहे. त्यांच्या सहृदय स्वभावाची, जनतेशी असलेल्या आपुलकीची आणि विकासकार्यावरील निष्ठेची आठवण कायम सर्वांच्या मनात राहील.




