श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. गेल्या काही आठवड्यांपासून पक्ष कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा रंगत असताना अखेर दिनकर यांनी स्वतःच या चर्चेला पूर्णविराम देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नगराध्यक्षपदासाठी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल,” असे ठामपणे सांगत त्यांनी स्वतःच्या उमेदवारीबाबतचा गैरसमज दूर केला आहे. नितीन दिनकर हे भाजपचे संघनिष्ठ आणि प्रगल्भ राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आमदार नसतानाही त्यांनी श्रीरामपूर व तालुक्यातील विकासकामांना चालना देत स्थानिक समस्यांवर उपाय शोधले आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणी, तांडा-वस्तींसाठी निधी, गावठाण मर्यादेतील जमिनींचे प्रश्न, तसेच रेल्वे अतिक्रमणातील दोन हजार कुटुंबांच्या समस्येवर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून स्थगिती मिळवून देणे या सर्व प्रयत्नांमुळे त्यांनी लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे व्यापारी, शेतकरी आणि युवकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेला संधी न मिळाल्याने नगराध्यक्षपदासाठी आपण पुढे यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असली तरी त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवली. पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला पुढे आणून त्याला नगराध्यक्ष बनवण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे. अंतिम निर्णय पक्षाचा असेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.
त्यांच्या या विधानामुळे श्रीरामपूरच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे. स्वतःचे नाव सर्वाधिक चर्चेत असताना त्यांनी “प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, मग मी” या तत्त्वावर आपली भूमिका मांडत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आदराची भावना वाढली आहे. भाजप संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांत मोठे योगदान दिले आहे. पाटबंधारे खात्याशी संबंधित प्रलंबित विषयांवर पुढाकार, शहरातील अतिक्रमणमुक्ती मोहिमेत संवेदनशील भूमिका आणि “विकास प्रथम” या धोरणावर आधारित कामामुळे त्यांनी पक्षात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून स्थान मिळवले आहे.दरम्यान, श्रीरामपूर नगरपालिकेतील १७ प्रभागांमुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. अनेकांनी पुढचा नगराध्यक्ष मीच होणार! अशी घोषवाक्ये देणे सुरू केले असले तरी नागरिकांचा सूर स्पष्ट आहे.
“काम करणाऱ्यांनाच संधी!”राजकीय जाणकारांच्या मते, आगामी निवडणुकीत जर महायुतीत मतभेद निर्माण झाले, तर त्याचा थेट फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळे श्रीरामपूरवर भगवा फडकवायचा असेल, तर एकसंघतेने आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारासह लढणे महत्त्वाचे असल्याचे निरीक्षण आहे. नितीन दिनकर यांच्या निर्णयामुळे भाजपच्या शहर राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण झाले आहे. त्यांचे नेतृत्व आणि विचारशील भूमिका पाहता, कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर अधिक दृढ झाला आहे. पक्षात उमेदवार निवडीसंदर्भात आता पुढील घडामोडींची उत्सुकता वाढली असून, भाजपकडून कोणाला हिरवा कंदील मिळतो, याकडे संपूर्ण श्रीरामपूर शहराचे लक्ष लागले आहे.




