श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहर पोलिसांनी अवैध शस्त्रांवर अंकुश ठेवण्यासाठी धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, सलग दुसऱ्यांदा केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वीच तीन गावठी पिस्तुलांचा साठा हस्तगत करणाऱ्या शहर पोलिसांनी पुन्हा एकदा अचूक माहिती व नियोजनातून यशस्वी छापा टाकत पाच अवैध तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी गुलाबनबी अन्वर शेख (वय २०, रा. श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वार्ड क्रमांक २ परिसरात अवैध शस्त्रांचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. कारवाईत गुलाबनबी शेख हा संशयित युवक पाच बेकायदेशीर तलवारींसह आढळून आला. तलवारींची अंदाजे किंमत ३ हजार रुपये असून, त्या कायदेशीर परवानगीशिवाय बाळगल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी मिळते, याची जाणीव ठेवून शहर पोलिसांनी नुकतेच तीन गावठी पिस्तुलांचा मोठा साठा हस्तगत करून दाखल केलेला गुन्हा अद्याप ताजा असतानाच ही नवी कारवाई केली आहे. अवघ्या काही दिवसांत सलग अशा दोन मोठ्या कारवाया घडवून आणल्याने गुन्हेगारीसाठी शस्त्रांचा वापर करण्याचा विचार करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचनांनुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी संपूर्ण ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडले. कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, सहाय्यक फौजदार सुर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रसाद साळवे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, संपत बडे, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, धनंजय वाघमारे, रवींद्र शिंदे, सचिन दुकळे, बाळासाहेब गिरी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उज्वला मुसमाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा तपास पुढे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन हे निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
गुलाबनबी शेख याच्याविरोधात भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगीशिवाय शस्त्र बाळगणे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. पुढील तपास सुरू असून, शस्त्रांचा पुरवठा कोणत्या मार्गाने झाला आणि त्याचा वापर कोणत्या हेतूसाठी होणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. या सलग कारवायांमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा जबरदस्त वचक निर्माण झाला आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमध्ये तलवारी, पिस्तुले यांसारख्या शस्त्रांचा वापर वाढू लागल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. त्यावर पोलिसांनी वेळीच धडक कारवाई करत स्पष्ट संदेश दिला आहे की, श्रीरामपूर शहरात अवैध शस्त्रांना स्थान नाही.
श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, अवैध शस्त्रांवर अंकुश ठेवणे हे आमचे प्राधान्य असून, शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील. या कारवाईनंतर सामान्य नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींची माहिती पोलिसांना तातडीने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवैध शस्त्रांवर उघडलेली ही मोहीम शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक ठरली आहे. दोन दिवसांत गावठी पिस्तुलांसह तलवारी जप्त होणे ही चिंतेची बाब असली, तरी पोलिसांनी दाखविलेली तत्परता व कणखर भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी आहे.यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहिल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसून श्रीरामपूर शहरात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याविषयी घेतलेला स्पेशल आढावा पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा




