संगमनेर (प्रतिनिधी):– संगमनेर फेस्टिव्हलच्या १७ व्या वर्षीच्या कार्यक्रमात अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला. गणेश आरतीने मंगलमय वातावरणात प्रारंभ झालेल्या या उत्सवात राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी स्वागतपर भाषण केले, तर संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यानंतर आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्याच्या सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक परंपरेचा गौरव करत, मालपाणी उद्योग समूह व राजस्थान युवक मंडळाचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी विशेष उल्लेख करत सांगितले की, यावर्षी तब्बल ११ वर्षांनी होणारी मिरवणूक नक्कीच आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
मात्र, भाषणानंतर आमदार खताळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच अचानक एका माथेफिरु व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ हल्लेखोराला पकडून चोप दिला. जवळपास २० मिनिटे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
आमदार खताळ सुरक्षितपणे निघून गेल्यानंतर उपस्थितांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सांस्कृतिक वातावरणात झालेल्या या अराजक कृत्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. आयोजक मंडळ व मान्यवरांनी घटनेची निंदा केली असून, पोलिसांनी हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या अनपेक्षित घटनेने उत्सवी सोहळ्याला गालबोट लागले असले तरी, संगमनेर फेस्टिव्हलच्या पारंपरिक उत्साहात कोणतीही खंड पडू नये यासाठी आयोजक व नागरिक प्रयत्नशील आहेत.




