श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामपूर शहरात वराह जयंतीचा उत्सव जल्लोषात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. गोंधवनी महादेव मंदिरापासून संध्याकाळी सहा वाजता निघालेली भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध रीतीने मार्गक्रमण करत पुढे सरकली. या मिरवणुकीत हजारो नागरिकांसह तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पारंपरिक वेशभूषा, भगवे टोप्या, हातात झेंडे आणि “जय श्रीराम”, “वराह जयंती की जय” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवले. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात सुरक्षा तैनात करण्यात आली. आयोजक आणि पोलिसांच्या समन्वयामुळे मिरवणूक शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित रितीने संपन्न झाली.
या जल्लोषमय मिरवणुकीला जय श्रीराम आखाड्याचे संस्थापक अर्जुन दाभाडे, शिवसेनेचे नेते सागर भोसले, आरपीआयचे शहराध्यक्ष विजय पवार, राजेंद्र मोरे यांच्यासह आखाड्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वराह जयंती निमित्त निघालेली ही मिरवणूक श्रीरामपूरच्या धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक एकजूट आणि उत्सवप्रियतेचे प्रतीक ठरली. तरुणांचा उत्साह, नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाचा ताळमेळ यामुळे मिरवणुकीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
चला तर मग या मिरवणुकीचे काही क्षणचित्रे पाहूया




