श्रीरामपूर : शहरातील नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि शिस्तबद्धता यांना प्राधान्य देत श्रीरामपूर नगरपालिकेत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या आठ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांतधिकारी किरण सावंत यांच्या हस्ते, तर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी नगरपालिकेतील विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अंजना राजु चव्हाण, बाळू श्रावण चव्हाण, गजानन भाऊराव मगर, किरण गजानन मगर, विठाबाई सुनील खरात, हर्षाबाई संजय जाधव, मीना दिलीप प्रधान आणि सुभाष केशव शेळके यांचा समावेश आहे. त्यांच्या वारसांना नियमांनुसार नियुक्ती आदेश देण्यात आले असून, त्यात प्रसाद राजू चव्हाण, दीपक बाळू चव्हाण, सागर गजानन मगर, आकाश गजानन मगर, दीपक सुनील खरात, अनिकेत संजय जाधव, मुकुंद दिलीप प्रधान आणि सुशील सुभाष शेळके यांची नावे आहेत.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असून, उर्वरित प्रश्नही लवकरच सोडवले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहर प्रशासनात त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि जनसंपर्काला प्राधान्य देत नवी कार्यशैली रुजवली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, करप्रणाली व नागरिकांच्या तक्रारी अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जबाबदारी निश्चित करून प्रशासन अधिक गतिमान केले आहे.नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘ओपन हाऊस’ बैठका, सोशल मीडियावरून तक्रारींचे निराकरण, पत्रकार परिषदेद्वारे दिलेले पारदर्शक स्पष्टीकरण अशा उपक्रमांमुळे प्रशासनाबाबतचा विश्वास वाढला आहे. शिस्तबद्ध नियोजन, लोकाभिमुख निर्णय आणि तत्पर कार्यवाही ही घोलप यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
या कार्यक्रमाला कामगार युनियनचे जीवन सुरुडे, आस्थापना विभाग प्रमुख दिपक खोब्रागडे, लेखापाल विजय गाडेकर, आस्थापना विभागातील अमोल साळुंखे व संजय प्रधान, माजी नगरसेविका प्रणिती चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. या नियुक्त्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने हा निर्णय झाल्याने नगरपालिकेच्या प्रशासनाबाबत सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.




