श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरवासीयांसाठी महत्त्वाचा ठरणारा ऐतिहासिक क्षण लवकरच अवतरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आगामी दहा ते पंधरा दिवसांत तयार होणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणारे उद्घाटन. त्यांची वेळ व तारीख निश्चित झाल्यानंतर लोकार्पणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषयही आता मार्गी लागला आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश येत असून, लवकरच हा पुतळाही उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या पद्धतीने अहिल्यानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला, त्याच धर्तीवर श्रीरामपूर शहरातही हा पुतळा निर्माण होणार आहे.खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी मोठी घोषणा करत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने दीड कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात येत आहे. हे स्मारक आणि पुतळा येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर उद्घाटन समारंभ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडणार आहे.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमांबाबत भाष्य करताना खासदार विखे म्हणाले, आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना लोक कंटाळले आहेत. लोकांना प्रत्यक्ष उद्घाटन पाहिजे. केवळ दगड ठेवून काही उपयोग नाही. या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी अलीकडील भूमिपूजनप्रधान राजकारणावर अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधक आमदार हेमंत ओगले यांच्यावरही निशाणा साधला. नुसती पाहणी करून प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी निधी मंजूर करून आणावा लागतो, असे म्हणत त्यांनी प्रशासन आणि विकास यामधील सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.
शहरातील सत्तासंघर्ष आणि गटबाजीवर भाष्य करताना विखे म्हणाले, भाजप हा महाराष्ट्रातच नव्हे तर जिल्ह्यातही सर्वात मोठा पक्ष आहे. जसे कुटुंब वाढते तसे भाऊबंदकीही वाढते. सध्या दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. आम्ही तिसरा गट स्थापन करून मुद्दाम भांडण घालत आहोत. कारण जेव्हा चार लोकांमध्ये स्पर्धा होते, तेव्हा खरंच हुशार कोण हे सिद्ध होतं. त्यातच जो सर्वात योग्य ठरेल त्याला नगरसेवक म्हणून संधी मिळेल. या वक्तव्यातून त्यांनी भाजपच्या आतल्या गटतटांवर भाष्य करत स्पष्टपणे सांगितले की, योग्य नेतृत्व आणि कार्यक्षमता हीच पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाची असणार आहे. गटबाजी नको, विकासाची स्पर्धा हवी, असा त्यांचा अप्रत्यक्ष संदेश असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. श्रीरामपूर शहरासाठी हे दोन्ही स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार असून, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक न्याय यांचा संगम या दोन्ही प्रकल्पांतून घडणार आहे. आगामी काही दिवसांत हे लोकार्पण सोहळे शहरवासीयांना ऐतिहासिक अनुभव देणारे ठरणार आहेत.