श्रीरामपुर/प्रतिनिधी:– सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेण्याबाबत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला ठोस निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चार आठवड्यांत अधिसूचना काढा आणि पुढील चार महिन्यांत निवडणुका घ्या. 1994 ते 2022 दरम्यान ओबीसी आरक्षणाचे जे प्रमाण होते त्यानुसारच निवडणुका घेण्याचे आदेशही दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक प्रशासकांकडे चालणाऱ्या स्थानिक संस्था निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजी नगर आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासक कार्यरत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू असून, नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवकपदासाठी नावांची चर्चा रंगू लागली आहे. मागील काही वर्षांपासून शहरात ससाणे गट आणि आदिक गट यांनी पक्षापेक्षा व्यक्तीप्रधान राजकारण केले असले तरी यंदा परिस्थिती बदलली आहे. भारतीय जनता पार्टीने सक्रिय सहभाग नोंदवल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. सध्या चार प्रमुख गट — भाजपा, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाटा गट — निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष बाब म्हणजे, प्रत्येक पक्षात नगराध्यक्ष पदासाठी दोन ते तीन इच्छुक सक्रिय झाले असून, ही स्थिती पक्षांतर्गत स्पर्धेला अधिक धार देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे नाव चर्चेत आहे, तर काँग्रेसकडून राजेश्री ससाणे किंवा दीपाली ससाणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
स्व. ससाणे यांच्या प्रभावामुळे याआधी इतर कोणताही उमेदवार विशेष तग धरू शकला नव्हता. मात्र, अलीकडील काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपकडूनही उमेदवारांचा भक्कम दबाव जाणवतो आहे. या निवडणुकीत केवळ पक्षांतरच नव्हे तर अपक्षांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. शहरात अशी परंपरा आहे की, काही वेळा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींनाही “लढ, आम्ही मदत करतो” असं म्हणत रिंगणात उतरवलं जातं. यंदाही ही परंपरा कायम राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
पक्षांचे अधिकृत तिकीट मिळवण्यासाठी चाललेली धडपड सध्या शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक गटात अंतर्गत गटबाजी, चर्चा, आणि दबाव राजकारण सुरू असून, अंतिम उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराकडे झुकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्रीरामपुर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, मतदारांसमोर निवडणुकीच्या पारदर्शकतेपासून ते विकासाच्या मुद्द्यांवर आधारित निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी चार महिन्यांत स्थानिक राजकारणात घडणारे बदल हे या निवडणुकीचे खरे रंग ठरतील.