श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत सध्या सुरू असलेले शिरसगाव-ब्राह्मणगाव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप शिरसगावचे युवा नेतृत्व व राष्ट्रीय श्रीराम संघाचे शाखाध्यक्ष रोहित यादव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल करून काम तातडीने थांबवण्याची आणि तज्ज्ञ अभियंत्यांची समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या गावांना जोडणारा हा रस्ता वैजापूर मार्गाला जोडतो. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कायमच सक्रिय असते. मात्र सध्या सुरू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून, डांबरीकरण अपूर्ण आहे, रस्त्याची सपाटी योग्य प्रकारे दिली गेलेली नाही, तसेच अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत, असा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे.
तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, कामासाठी वापरलेली सामग्री निकृष्ट दर्जाची असून, कोणत्याही मानक प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता काम पार पडत आहे. त्यामुळे काहीच दिवसांत हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.यादव यांनी या प्रकरणात ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली असून, कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची समिती नेमावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, पुढील कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.