Homeमहाराष्ट्रअहिल्यानगरअहिल्यानगर मंत्रीमंडळ विशेष बैठकीत जिल्हा विभाजनाचा ऐतिहासिक निर्णय होण्याची जनतेला अपेक्षा –...

अहिल्यानगर मंत्रीमंडळ विशेष बैठकीत जिल्हा विभाजनाचा ऐतिहासिक निर्णय होण्याची जनतेला अपेक्षा – सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांची जोरदार मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी जामखेड तालुक्यातील त्यांच्या जन्मगाव चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत ‘जिल्हा विभाजन’ या ऐतिहासिक विषयावर निर्णय घेतला जावा, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा विभाजनाच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची प्रबळ भावना आहे.

अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून, प्रशासकीय सुविधांचा अभाव व कामाचा वाढता ताण यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला मोठा जनादेश मिळाल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारकडून जिल्ह्यातील जनतेला प्रचंड अपेक्षा आहेत.

लोंढे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “शरद पवार यांच्या पाठोपाठ हा विषय एकट्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी गांभीर्याने हाताळला आहे. तसेच माजी मंत्री राम शिंदे हे देखील जिल्हा विभाजनाच्या मागणीसाठी सातत्याने आग्रही राहिले आहेत. त्यांची आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची राजकीय मैत्री व समन्वय या ऐतिहासिक निर्णयाला गती देण्यासाठी निर्णायक ठरू शकतो.

“या विशेष बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, कुंभमेळा नियोजन, प्रशासकीय सुधारणा, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन विकास अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, जिल्हा विभाजनासारखा दीर्घकालीन व जनतेच्या हक्काचा विषय या बैठकीत चर्चेला आला नाही, तर ही बैठक निष्फळ ठरेल आणि जनतेच्या भावनांचा अपमान होईल, असा स्पष्ट इशाराही लोंढे यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, “मंत्रीमंडळाच्या या विशेष बैठकीत जिल्हा विभाजनाबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय होणे काळाची गरज आहे. यामुळे केवळ प्रशासकीय सुसूत्रता नव्हे, तर नागरिकांचा शासनावरचा विश्वासही अधिक दृढ होईल.” या पार्श्वभूमीवर जिल्हा विभाजनाच्या मागणीला आता नव्याने जोर चढला असून, राज्य सरकारने या ऐतिहासिक क्षणाचा लाभ घेत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
35.5 ° C
35.5 °
35.5 °
26 %
2kmh
0 %
Sun
40 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
41 °
Thu
38 °

Most Popular

error: Content is protected !!