श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, ग्रामपंचायत महसूल सहायक उत्तम रासकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. विशेष आकर्षण ठरले ते अभिनव सुनिल कर्डिले या लहानग्याच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आलेले.
या आरक्षण प्रक्रियेत एकूण २७ ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षण लागू झाले असून, महिला नेतृत्वाच्या संधींचा मोठा मार्ग खुला झाला आहे. यामध्ये अनुसूचित जातींसाठी निमगाव खैरी, पढेगाव, मांडवे, मालुंजा ब्रु., लाडगाव, कुरणपूर आणि वडाळा महादेव या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जमातींसाठी माळेवाडी, ब्राम्हणगाव वेताळ, रामपूर, वळदगाव आणि माळेवाडी या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) यासाठी भामठाण, एकलहरे, वांगी बु., कारेगाव, उंदिरगाव, उक्कलगाव आणि जाफ्राबाद या गावांमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण बेलापूर बु., गोंडेगाव, मुठेवाडगाव, नायगाव, सरला, नाऊर, गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव आणि मातापुर या ग्रामपंचायतींना प्राप्त झाले आहे.
आरक्षण कसे काढले जाते याबाबत माहिती देताना उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांनी सांगितले की, जातनिहाय आरक्षणासाठी १९९५ पासूनचा कालखंड विचारात घेतला जातो, तर महिला आरक्षणासाठी लगतच्या आरक्षणाचा क्रम अनुसरावा लागतो. त्यामुळे आरक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असून, तांत्रिक नियमांवर आधारित असते. या आरक्षण प्रक्रियेमुळे तालुक्यात राजकीय चुरस वाढणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी मिळणार आहे. विशेषतः महिलांसाठी खुले झालेले दरवाजे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.