श्रीरामपूर : महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणाऱ्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२५’ मध्ये कबड्डी स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव गावचा वीरेंद्र मुंडलिक याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. ४ मे ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये होणाऱ्या या राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तो आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या कसोशीत राज्य चाचण्यांमध्ये वीरेंद्रने आपले कौशल्य, चपळता आणि आक्रमकता यांची झलक दाखवत थेट संघात स्थान मिळवले. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक महेश कोल्हे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्याने आपली प्रतिभा घडवली आहे.
यशवंत विद्यालय, पढेगावचा विद्यार्थी असलेल्या वीरेंद्रने ग्रामीण भागातून पुढे येत, अपार मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या घवघवीत कामगिरीमुळे श्रीरामपूर तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात दबदबा वाढला आहे. वीरेंद्रच्या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष शिरोळे सर, काका चौधरी, नितीन बलराज, संभाजी ढेरे, अजित कदम व इतर मान्यवरांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. वीरेंद्रसारख्या खेळाडूची राष्ट्रीय पातळीवर निवड ही तालुक्यातील इतर युवा खेळाडूंना नवे स्वप्न दाखवणारी आणि प्रेरणादायी ठरणार आहे.