श्रीरामपूर (प्रतिनिधी): तालुक्यात राजकीय हालचालींना जोर चढला असून, अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत पन्नास हजारांहून अधिक मते मिळवलेल्या सागर बेग यांच्या प्रभावाने सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात बेग यांच्या अचानक उदयाने राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. चार वर्षांपासून नगरपालिका कारभार प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळे नगरसेवकांनाही आपली पकड टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांवर बिनधास्त वर्चस्व गाजवणाऱ्या गटांमध्ये आता नगरसेवक पदाच्या निवडणुकीची ओढ निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी म्हणून दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत सागर बेग यांच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या मतांनी काँग्रेस व भाजप दोन्ही गटांत अस्वस्थता निर्माण केली. त्यामुळे काँग्रेसमधील काही माजी नगरसेवकांनी हिंदुत्वाचा आधार घेत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र बेग यांच्या वाढत्या लोकप्रियतेपुढे त्यांचा हा डावही अपुरा ठरतोय असे चित्र आहे. बेग यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली. काहींनी गुप्त बैठका घेऊन पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र या बैठका बाहेर येताच स्थानिक जनतेमध्ये संभ्रम आणि नाराजी दोन्ही पसरली.भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या नगरसेवकांवर स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट आरोप केला आहे की, “ते हिंदूंच्या हितासाठी नाही, तर फक्त आपल्या राजकीय भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी भाजपमध्ये आले आहेत.” त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून, काही ठिकाणी उघडपणे विरोधही नोंदवला जात आहे. “जे आजवर काँग्रेससाठी काम करत होते आणि हिंदू मतांच्या विरोधात भूमिका घेत होती, ते अचानक हिंदुत्वाचे झेंडे घेऊन आले, हे कसे खपवून घ्यायचे?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
सागर बेग यांनी कोणतीही पारंपरिक राजकीय चढाओढ न करता थेट जनतेतून विश्वास संपादन केला. त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांनी शहरातील नव्या आणि तरुण मतदारांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या आश्रयावर निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या मर्जीवरच अवलंबून राहिलेल्या गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत बेग यांना फक्त दहा हजार मते मिळतील असा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र निकालाने हे सर्व अंदाज फोल ठरवले आणि बेग यांचे नाव संपूर्ण श्रीरामपूरात गाजले.
सध्या हिंदुत्ववादी वातावरणामुळे भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना काहीसा फायदा होत असला तरी, स्थानिक राजकारणात विश्वासार्हता आणि कामगिरी यांना मोठे महत्त्व आहे. सागर बेग यांची लोकप्रियता पाहता, आगामी नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणाऱ्या उमेदवारांनाच जनतेचा कौल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखेर मतदारच निर्णय घेणारा आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या पुढील राजकीय समीकरणात सागर बेग यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.