श्रीरामपुर : सध्या शहरातील भाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून मोठे राजकारण पेटले आहे. प्रत्यक्षात पाहता, छत्रपती शिवाजी महाराजांप्रती खरी निष्ठा दाखवायची की केवळ राजकीय श्रेयासाठी संघर्ष उभा करायचा, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१५ साली तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला. परंतु त्याच वर्षी कला संचालनालयाने या पुतळ्यात दोष आढळल्याचे स्पष्ट केले होते. तद्नंतरही या दोषयुक्त पुतळ्याबाबत संघर्ष करून आज त्याची स्थापना करणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
चाळीसगावात २०१८ मध्ये शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महामार्गावरील चौकात नवीन पुतळे बसवण्यावर बंदी आणण्यात आली. यामुळे नवीन पुतळा बसवण्यास नियमांची अडचण स्पष्टपणे समोर आहे. तथापि, या सगळ्या सत्य परिस्थितीची माहिती जनतेसमोर प्रामाणिकपणे मांडली जात नाही. उलट, विविध राजकीय मंडळी आपला लढा मोठा असल्याचे भासवून स्वतःची पोच वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
यात अधिक चिंतेची बाब म्हणजे, जर दोषयुक्त पुतळा बसवला गेला, तर तो केवळ नामुष्कीच ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचा पुतळा भव्य आणि तेजस्वी दिसला पाहिजे, तो पाहून जनतेला अभिमान वाटला पाहिजे, असे सामाजिक भान काहीजण सोयीस्करपणे दुर्लक्षित करत आहेत. याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे भूमिका मांडली असून, शहरातील आर्किटेक्ट, कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ नाशिक येथे नेऊन संबंधित पुतळ्याची गुणवत्ता आणि नियमांची खात्री करूनच तो ताब्यात घ्यावा व बसवावा, अशी मागणी केली आहे.