श्रीरामपूर : राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने श्रीरामपूर येथे भव्य जाहीर प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी आगाशे सभागृह, टिळक वाचनालय, मेन रोड श्रीरामपूर येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन नामवंत उद्योजक जितेंद्र तोरणे यांच्या हस्ते होणार असून, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे प्रखर अभ्यासक व प्रवर्तक इंजि. आप्पासाहेब गायकवाड तसेच लहुजी सत्यशोधक संघटनेच्या अध्यक्षा नंदाताई लोखंडे प्रमुख व्याख्याते म्हणून विचारमंथन करणार आहेत. या निमित्ताने जिल्हाभरातून शेकडो परिवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला व विविध स्तरांतील बुद्धिजीवी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने बहुजन समाजातील सर्व घटकांनी तन-मन-धनाने या कार्यक्रमात सहभागी होऊन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.