श्रीरामपूर/प्रतिनिधी :– शहराच्या राजकीय गोटात सध्या चांगलाच गहजब पाहायला मिळतो आहे. स्वर्गीय ससाणेच्या नेतृत्वाखाली एकेकाळी संघटित असलेला काँग्रेस पक्ष आज फाटाफूटीनंतर अस्ताव्यस्त झाला आहे. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली उभी फूट दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा एक गट विभक्त होऊन स्वतंत्रपणे सक्रिय झाला होता.
याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, स्व. ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारकी मिळवलेले भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसचा हात सोडून थेट शिवसेनेचा भगवा हातात घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या उलथापालथी, सत्तेसाठी केलेल्या युती आणि बदललेल्या समीकरणांचा स्थानिक राजकारणावर खोलवर परिणाम झाला. जे नेते कधी एकमेकांचे कट्टर विरोधक होते, तेच आज एकत्र येऊन प्रचारात सहभागी होत आहेत. परिणामी, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हलचल सुरू आहे. काँग्रेस पक्षातील तब्बल दहा ते बारा नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने संपूर्ण शहरात जोरात चर्चा रंगल्या आहेत. या संभाव्य घडामोडींनी भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण असले तरी यामुळे ससाणे गटाला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी “ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत आणखी मोठ्या राजकीय भूकंपाची सूचनाही दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत श्रीरामपूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्तेच्या लालसेपोटी नेते बाजू बदलत असताना, सामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत. निष्ठा, मूल्ये आणि पक्षाशी असलेले भावनिक नाते आज बाजूला पडल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांमध्ये “नेते तुपाशी आणि आम्ही उपाशी” अशी भावना रुजताना स्पष्ट दिसते आहे. यामुळे राजकारणातील सध्याची दिशाहीनता अधिकच गडद होत असून, सामान्य जनतेच्या भावना पायदळी तुडवल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहे.