श्रीरामपूर/प्रतिनिधी :– शहरात हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व भक्तिभावाने साजरा केला जाणारा रामनवमीचा उत्सव यंदा विशेष रूपात साजरा झाला असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गुरुवार, दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी, श्रीरामाच्या जन्मदिनी पारंपरिक धार्मिक विधींनुसार रामनवमी यात्रेचा शेवट साजरा होत असताना, राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांच्या संकल्पनेतून आणि सागर मैय्या बेग यांच्या पुढाकाराने १२ वर्षाखालील मुला-मुलींसाठी मोफत पाळण्यांची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की, जेथे सामान्यतः लोकांना यात्रेतील मनोरंजनासाठी आणि पाळण्यांसाठी रांगा व खर्च करावा लागतो, तिथे हा उपक्रम केवळ लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी व त्यांना आनंददायी अनुभव देण्यासाठी राबवला जात आहे. धार्मिकतेच्या जोडीला सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत, यात्रेत सहभागी होणाऱ्या कुटुंबांना आणि विशेषतः त्यांच्या लहानग्यांना आनंददायी क्षण देण्याचा सागर भैय्या बेग यांचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.
सागर भैय्या बेग यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, “३६५ दिवस मुलं पाळण्यांची वाट पाहतात, पण रामनवमीच्या दिवशी त्यांच्या आनंदासाठी आपण पुढे आलो पाहिजे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसह यात्रेत सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि यात्रेची शोभा वाढवावी.” हा उपक्रम फक्त एक सोयीची सेवा न राहता, श्रद्धा आणि संस्कृतीचा एक सुंदर संगम ठरणार आहे. मोफत पाळण्यांची व्यवस्था आधुनिक, सुरक्षित व डिजिटली सज्ज अशा प्रकारे करण्यात आली असून, बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे यात्रेत बालकांचाही उत्साह वाढेल आणि कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करतील.

दरवर्षी श्रीराम यात्रेला साजरे करण्याचा उत्साह वाढत जावा हा या मागचा उद्देश असुन . सागर भैय्या बेग यांच्या नेतृत्वात या वर्षी ही यात्रा केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित न राहता, सामाजिक भान जपणारी आणि लोकहित साधणारी होत चालली आहे. मोफत पाळण्यांचा उपक्रम हे त्याचेच एक ठळक उदाहरण आहे. या उपक्रमामुळे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये यात्रेच्या प्रति नवीन उमेद व उत्साह निर्माण झाला आहे. संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण तयार झाले असून, भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात हा सामाजिक उपक्रम यात्रेच्या आकर्षणात भर घालणारा ठरणार आहे.