श्रीरामपूर (प्रतिनिधी) – माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिपक कदम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष हारून अ.समद शेख, राष्ट्रीय महासचिव योगेश प्र.दंदणे आणि राष्ट्रीय समन्वयक भरत नजन सर यांच्या संयुक्त निर्णयानुसार करण्यात आली. दिपक कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून, त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेत समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा आलेख लक्षात घेता संघटनेने त्यांच्यावर विश्वास दाखवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.
या निवडीमुळे संघटनेची कामगिरी अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडता येतील, असा विश्वास संघटनेच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे. तसेच पत्रकार संरक्षण आणि महिला हक्क विषयक उपक्रमांना जिल्हा पातळीवर बळकटी मिळेल, असेही सांगण्यात आले. दिपक कदम यांच्या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि श्रीरामपूर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.