दत्तनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद गट व गणातील अनुसूचित जातींसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या मागणीसाठी दत्तनगर येथे दलित संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत असून, राजकीय दबावापासून मुक्त राहून आरक्षणाची मागणी करण्यावर भर दिला जात आहे. दत्तनगर, खंडाळा, भैरवनाथनगर, शिरसगाव यांसारख्या गावांमध्ये सरपंच पद अनुसूचित जातींसाठी आलटून पालटून आरक्षित करण्यात आले असले, तरी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचा विचार न केल्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे यावेळी गट व गणातील आरक्षण निश्चित करताना वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि पुराव्याच्या आधारे मागणी लावून धरण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

OBC आरक्षण प्रकरणामुळे गेली चार वर्षे निवडणुका लांबल्या असून, आता 2025 ते 2030 या कालावधीसाठी नव्याने आरक्षण निश्चित होणार आहे. मात्र, अनुसूचित जातींना अपेक्षित आरक्षण मिळेल का, यावर साशंकता आहे. त्यामुळे जर यावेळी संधी हुकली, तर पुढील आरक्षणासाठी 2031 ते 2036 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. ही बैठक सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने होत असली तरी अनेक राजकीय पक्षांचे स्थानिक नेते देखील या विषयावर एकमताने पुढे येत असून, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दत्तनगर गावात हीच शेवटची संधी असल्याची चर्चा रंगत असून, त्यामुळे बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे.