श्रीरामपूर (प्रतिनिधी) : जानेवारी–फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात आलेल्या प्रलयंकारी अतिक्रमण मोहिमेमुळे श्रीरामपूर शहरातील अंदाजे दोन ते सव्वा दोन हजार दुकाने जमीनदोस्त झाली. या कारवाईमुळे हजारो कुटुंबांचा प्रपंच रस्त्यावर आला असून त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे ठप्प झाला आहे. या दुकानदारांचे तात्काळ पुनर्वसन व्हावे, यासाठी समर्पित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीत नायब तहसीलदार श्री. शिंदे यांना निवेदन दिले. दुकानदारांना पूर्वी ज्या ठिकाणी दुकाने होती त्याच ठिकाणी किमान पाच बाय पाच फुटांच्या गाळ्यांच्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदनकर्त्यांनी सांगितले की, ३५ ते ४० वर्षांपूर्वी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या दुकानदारांना रस्त्याच्या कडेला जागा देऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवला होता. मात्र सध्याच्या अतिक्रमण मोहिमेमुळे हजारो कुटुंबे उपासमार व संकटात सापडली असून त्यांचे मानवी दृष्टीकोनातून पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा उपोषण, धरणे, रास्ता रोको अशा लोकशाही मार्गांचा अवलंब करावा लागेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या निवेदन प्रसंगी हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक व शहराध्यक्ष किरण लूनिया, भाजपचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, संजय यादव, गणेश भिसे, बाळासाहेब अहिरे, तुषार बोबडे, शेखर आहेर, सिद्धार्थ साळवे, अर्जुन करपे, सोमनाथ पतंगे, बाळासाहेब गाडेकर जना सोनवणे, रमेश शिनगारे, राजू देवकर, विलास राऊत, किशोर बिंगले, शिवाजी सूर्यवंशी, विशाल जाधव, विकी चव्हाण, रवींद्र चव्हाण, संदीप धनेदर, सोमनाथ मढीकर, प्रशांत मोरे, अशोक लोखंडे आदींसह समर्पित भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




