श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीची रंगत वाढत असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेनेने आपले पहिले बडं कार्ड उचलत मल्लू शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताच प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या मल्लू शिंदे यांनी पाणीटंचाई, रस्ते-दुरुस्ती, ड्रेनेज समस्या, स्वच्छता आणि अंगणवाडी-सुविधा अशा मुद्द्यांवर सातत्याने काम केले आहे. त्यामुळे आण्णा भाऊ साठेनगर, आंबेडकर कॉलनी, वैदू-वडार वाडा व एज्युकेशन हायस्कूल परिसरात त्यांचा ठोस जनाधार असल्याचे दिसून येत आहे.
अर्ज भरताना शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि शेकडो समर्थकांची मोठी उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी तालुका कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शिंदे यांनी निवडून आल्यास नाले-गटार दुरुस्ती, नियमित पाणीपुरवठा, मजबूत रस्ते, महिला-युवा उपक्रम आणि स्वच्छता प्रकल्प हे पाच मुद्दे प्राधान्याने राबवण्याचे आश्वासन दिले.या प्रभागातून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांचे उमेदवारही तयारीत असल्याने चुरशीची बहुकोनी लढत निश्चित आहे. सामाजिकदृष्ट्या विविध मतदारसंख्या आणि बदलणारी समीकरणे लक्षात घेता यंदाची लढत विशेष रंजक ठरणार आहे.मल्लू शिंदे यांच्या प्रवेशाने प्रभाग २ मधील स्पर्धा तीव्र झाली असून आता इतर उमेदवारांचे पाऊल कोणत्या दिशेने पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




