श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगतसिंग चौक परिसरात रविवारी (दि. १७ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या तब्बल आठ वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले. विशेष म्हणजे, ही घटना शहरातील पोलीस मदत केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पहाटे दोनच्या सुमारास सुमारे ८ ते १० जणांचा गट धारदार शस्त्रांसह परिसरात दाखल झाला. अचानक गाड्यांवर दगडफेक करत त्यांनी तीनचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या तर काही वाहनांचे दरवाजे, टायर व हेडलाईटचे नुकसान करण्यात आले. या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा थेट संबंध १७ सप्टेंबर रोजीच झालेल्या टोळीयुद्धाशी जोडला जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. त्या घटनेतील काही आरोपींच्या घराजवळच वाहनांची तोडफोड झाल्याने हा सूडाचा भाग असल्याचा कयास वर्तवला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र शहराच्या मध्यवर्ती चौकात, तेही पोलीस मदत केंद्राच्या जवळ अशी घटना घडणे हे पोलिसांच्या दक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तात्काळ कडक कारवाईची मागणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली असून सामान्य नागरिक असुरक्षित वाटत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना लवकरच गजाआड केले जाईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले आहे. सध्या शहरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या प्रकारामुळे श्रीरामपूरातील गुन्हेगारी व सुरक्षा यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहाटे श्रीरामपूर पुन्हा हादरले ! पोलीस मदत केंद्राजवळच ८ गाड्या फोडल्या; पाहा थरार ! पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा




