श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे हिंसक दर्शन घडले आहे. बुधवारी रात्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, थेट नगरपरिषदेसमोर, दोन गटांमधील वादातून दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रुद्र जगधने आणि साई साळवे हे तरुण गंभीर जखमी झाले असून, हल्ल्यात रुद्र जगधने याला आपली एक किडनी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साई साळवे याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात, तर रुद्र जगधने याच्यावर नगर येथील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच, मोठा जमाव श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत साहिल सय्यद यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी हल्ल्यातील जखमी नीरज गुप्ता यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे. श्रीरामपूर शहरात झालेल्या या हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, शहरात वाढलेली गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे. श्रीरामपूरमध्ये वारंवार घडत असलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी अधिक वृत्त पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा




