श्रीरामपूर (प्रतिनिधी ) :- आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी श्रीरामपूरमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अखेर ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत माहिती दिली. स्थानिक काँग्रेस आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि जिल्हाध्यक्ष सचिन कोते, तालुकाध्यक्ष लखन भगत, जेष्ठ नेते अशोक थोरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे.
तालुकाध्यक्ष लखन भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासह १७ प्रभागांसाठी एकूण ३४ उमेदवारांचे पूर्ण पॅनल उभे केले जाणार आहे. याचा अर्थ, दोन्ही मित्रपक्षांचे उमेदवार समोरासमोर निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने, याचा थेट परिणाम काँग्रेसच्या संभाव्य विजयाच्या समीकरणांवर होण्याची शक्यता आहे. या ‘मैत्रीपूर्ण लढती’मुळे मतांचे विभाजन होऊन, याचा मोठा तोटा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत श्रीरामपूरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार हे निश्चित आहे. याविषयी घेतलेला आढावा पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा




