श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गावठी पिस्तुलाच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलीस दलाने अवघ्या २४ तासांत कारवाईचा धडाका दाखवत मुख्य आरोपी हुजेफा शेखसह इतर दोन फरार आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला मोठा दिलासा मिळाला असून गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनांनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भंवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत अवघ्या एका दिवसात सापळा रचून हुजेफा शेखला बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भंवर यांनी स्पष्ट केले की, “शहरात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची कसून चौकशी केली जाईल. नियमित कॉम्बिंग ऑपरेशन व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, गुन्हेगारीबाबत नागरिकांना जर कोणतीही माहिती मिळाली तर ती त्वरित पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख संपूर्णपणे गुप्त ठेवली जाईल व तत्काळ कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पोलिसांच्या या तातडीच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, तसेच पोलीस प्रशासनाच्या नव्या ॲक्शन प्लॅनमुळे कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलिसांनी दाखवलेला हा वेगवान कारवाई केवळ आरोपींना जेरबंद करण्यापुरता मर्यादित नसून, पुढील काळात श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा मजबूत इशारा आहे.




