श्रीरामपूर – भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि दादासाहेब रूपवते यांची जन्मशताब्दी या त्रिसंगमाच्या प्रेरणादायी निमित्ताने संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित भव्य समारंभात दिपक कदम यांना ‘दादासाहेब रूपवते कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या मा. उत्कर्षाताई रूपवते, प्रसिद्ध विधीतज्ञ मा. अँड. संघराजजी रूपवते, तसेच प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्रा. श्रीरंजन आवटे, प्रा. मिलिंद कसबे आणि प्रा. राहुल गोंगे या मान्यवरांच्या हस्ते दिपक कदम यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने त्यांच्या सामाजिक कार्यास अधिकृत मान्यता मिळाली असून, वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांच्या संघर्षशील योगदानाची पावती देण्यात आली आहे.
समारंभास माजी महसूल मंत्री मा. आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार मा. आ. लहु कानडे, माजी आमदार मा. आ. सुधीर तांबे, मा. सौ. दुर्गाताई तांबे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
दिपक कदम यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य, सामाजिक न्यायासाठी घेतलेली भूमिका, आणि परिवर्तनवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग या सर्व कारणांमुळे त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यास उचित गौरव मिळाला आहे. समाजातील बदल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने एक प्रेरणादायी उदाहरण मिळाले आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
