श्रीरामपुर – माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक जाणीवेच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे रमण शेठ गुजराणी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फक्त एक व्यापारी नव्हे, तर समाजासाठी सदैव तत्पर राहणारा खरा समाजसेवक हरपला आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने नगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी नगरच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
रमण शेठ हे केवळ “माय चॉईस” या दुकानाचे मालक नव्हते, तर हे दुकान त्यांच्या सेवाभावाचे प्रतीक ठरले होते. विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सुरू केलेल्या अन्नछत्र उपक्रमात त्यांनी मोठे योगदान दिले. संकट काळात आवश्यक किराणा व साहित्य मिळवणे हे मोठे आव्हान असतानाही रमण शेठ यांनी सर्व अडचणी पार करत अत्यंत मनापासून मदत केली. त्यांनी कधीच व्यापारी गणित लावले नाही. गरजूंना वेळेवर साहित्य पोहोचवण्याचे काम त्यांनी अहोरात्र केले.त्यांचा एक वेगळाच मानवी दृष्टिकोन होता – “पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची,” ही त्यांची भूमिका होती. स्वॅप मशीन बंद असेल तर “नंतर पैसे द्या” असे म्हणत त्यांनी माणसांना आत्मसन्मानासह मदत केली. त्यांनी घेतलेले निर्णय केवळ व्यापारासाठी नव्हते, तर ते सामाजिक बांधिलकीचे उदाहरण होते.
अलीकडे रमजान ईदच्या काळात शीरखुरम्यासाठी लागणाऱ्या खोबऱ्याच्या किसाची विशेष मशीन घेऊन ते स्वतः ग्राहकांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून “खरी सेवा हीच असते” हा संदेश झळकत असे. “जे हवंय, ते द्या” असा कर्मचाऱ्यांना आदेश देत ते प्रेमळपणे ग्राहकांचे स्वागत करत. त्यांच्या वागणुकीत कधीही गर्व नव्हता, उलट दिलदार आणि सुसंस्कृत व्यवहार हा त्यांचा गुणधर्म होता. रमण शेठ गुजराणी हे नाव केवळ व्यापाराच्या क्षेत्रात नव्हे, तर माणुसकीच्या व्यवहारातही आदराने घेतले जात असे. त्यांच्या निधनाने एक जिवंत प्रेरणा स्रोत हरपला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचा प्रेमळ स्वभाव, मदतीसाठी नेहमी तयार असलेली वृत्ती आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेली प्रत्येक कृती नगरकरांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.
अखेरचा निरोप देण्यासाठी श्रीरामपूर शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये करण ससाणे, सचिन गुजर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पै.अर्जुन दाभाडे, बिट्टू कक्कड, गोपाल शिंदे, सचिन बोरकर, राजेंद्र पिपाडा, ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय छल्लारे, बाबासाहेब शिंदे, रमण मुथा, नानासाहेब पवार आदींचा समावेश होता. रमण शेठ, तुम्ही न सांगता आयुष्याच्या प्रवासातून अचानक निघून गेलात. पण तुम्ही मागे ठेवलेली माणुसकीची शिदोरी, सेवाभावाचा वारसा आणि प्रेमळ आठवणी आमच्या मनात सदैव जिवंत राहतील. समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आदर्श आहात – आणि सदैव राहाल.