श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरातील सिद्धार्थ नगर परिसरातील कॉलेजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या पाइपलाईन टाकण्याचे काम सुरू असून हे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेतच असल्याने स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची खोदाई व त्यातून निर्माण झालेले चिखलकट वातावरण, साचलेले पाणी व दुर्गंधी यामुळे या मार्गाने येण्या-जाणाऱ्या सर्वांना अक्षरशः धडकी भरते. या रस्त्यावरून दररोज शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र खोदलेला रस्ता व साचलेल्या घाण पाण्यातून वाट काढत जावे लागत असल्याने त्यांना त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा वाहनव्यवहार ठप्प होत असून परिसरात आरोग्यधोक्याचे संकटही निर्माण झाले आहे.
याशिवाय कॉलेजच्या मागील बाजूस असलेली गटार व्यवस्था देखील अपुरी व जीर्णावस्थेत असल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावर मिसळून अस्वच्छता वाढली आहे. या सर्व प्रश्नांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील रहिवाश्यांत संतापाची लाट आहे. सामाजिक कार्यकर्ते रितेश एडके यांनी या समस्येबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सिद्धार्थ नगर परिसरातील पाइपलाईन टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता सुरळीत करावा, तसेच गटारांची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने नगरपालिका समोर आंदोलन उभारले जाईल. स्थानिक नागरिकांनीही एडके यांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून हा मार्ग सुरळीत करावा अशी जोरदार मागणी होत आहे. काम अपूर्ण राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार असून, सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.




