श्रीरामपुर (प्रतिनिधी) – आमदार हेमंत ओगले यांनी ससाणे समर्थकांच्या भाजप प्रवेशाला कमी लेखणारे विधान करून राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. मात्र, त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे निलेश भालेराव यांनी जोरदार प्रतिकार केला असून, “फरक पडत नाही” हे वक्तव्य साफ चुकीचे आहे, असा घणाघात केला आहे.निलेश भालेराव यांनी स्पष्टपणे म्हटले की, भाजपात प्रवेश केलेले ससाणे समर्थक हे सामान्य कार्यकर्ते नसून, नावाजलेली व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वं आहेत. या सर्वांचा काँग्रेस पक्षाशी वैचारिक संबंध नसून, केवळ स्व. ससाणे साहेबांच्या प्रभावामुळे ते काँग्रेसमध्ये टिकून होते. स्व. ससाणे साहेब जिथे असत, तिथे हे समर्थकही खंबीरपणे त्यांच्यासोबत असत. त्यामुळे काँग्रेसप्रती त्यांची आस्था ही ससाणे यांच्यामुळेच होती, असेही भालेराव यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर भालेराव यांनी असा सवालही उपस्थित केला की, “ज्यांच्या पाठबळावर ओगले आमदार झाले, त्यांच्याच भाजप प्रवेशाने फरक पडत नाही असे म्हणणे हे त्यांच्या उपकारांचे विस्मरणच आहे.” भालेराव यांच्या मते, हे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक हे ससाणे यांच्यावर निष्ठावान होते आणि त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ओगले यांचे काम मनापासून केले. आज ते भाजपमध्ये गेले असले, तरी त्यांची निष्ठा ससाणे यांच्यावरच केंद्रित होती. “कदाचित ओगले यांना या बदलाचा फरक जाणवत नसेल, पण स्व. ससाणे साहेब असते, तर त्यांना नक्कीच याचा मोठा परिणाम जाणवला असता,” असे भालेराव म्हणाले. तसेच, त्यांनी इशारा दिला की, सध्याच्या घडामोडी पाहता भविष्यात ओगले हे काँग्रेसमध्ये एकटेच उरतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, ओगले यांना पक्षात किती साथ लाभते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.