श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर–बेलापूर रस्त्यावर गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजता झालेल्या भीषण अपघातात शहरातील तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगातील टाटा नेक्सॉन कारचा चालकावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 17 सीजे 0027 क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार बेलापूरहून श्रीरामपूरच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला.या अपघातात सुमीत विजय दळवी (वय 33) या तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातावेळी कारमध्ये त्यांच्यासोबत असलेले वेदांत दळवी आणि पार्थ सोनवणे हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून समजते.
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारचा पुढचा भाग पूर्णपणे नष्ट झाल्याने जखमींना बाहेर काढण्यासाठी कष्ट करावे लागले. दरम्यान, अपघाताविषयीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. श्रीरामपूर–बेलापूर रस्त्यावर वेगावर नियंत्रण न ठेवणे आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे मत आहे. या घटनेनंतर रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजना आणि वेगमर्यादा नियंत्रणाविषयीचे प्रश्न पुन्हा एकदा पुढे आले आहेत. याविषयी अधिक पाहण्यासाठी येथे 👉क्लिक करा




