श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आगामी नगरपरिषद निवडणुकीची राजकीय तापमान वाढत असताना शुक्रवारी अर्ज दाखल प्रक्रियेला वेग आला. नगराध्यक्षा पदासाठी तब्बल चार उमेदवारांनी, तर विविध प्रभागांतून दहा नगरसेवक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षा पदासाठी संजय छल्लारे, अशोक थोरे, निलेश भालेराव आणि जोएफ शेख या चार उमेदवारांनी अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या चारही नावांमुळे श्रीरामपूरच्या राजकारणात चढ-उतार पाहायला मिळत असून पुढील काही दिवसांत या स्पर्धेत आणखी नवे चेहरे सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगरसेवक पदासाठी एकूण १० अर्ज दाखल झाले असून त्यात विविध प्रभागांतील उमेदवारांचा समावेश आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ : वसंत कोल्हे, प्रभाग क्रमांक २ : रोहित शिंदे, जावेद पठाण, प्रभाग क्रमांक ९ : निलोफर शेख, प्रभाग क्रमांक १० : रवींद्र खिलारी, वैशाली पोटे, प्रभाग क्रमांक ११ : प्रसाद चौधरी, प्रभाग क्रमांक १५ : प्रकाश अहिरे, दिपाली मोरगे, प्रभाग क्रमांक १७ : स्नेहल खोरे अर्ज दाखल करण्याची मुदत शिल्लक असल्याने काही महत्त्वाचे उमेदवार अजूनही वाट पाहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे नगराध्यक्षा आणि नगरसेवक पदांची निवडणूक आणखी चुरशीची आणि रोमहर्षक होण्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय समीकरणातील बदल, अंतर्गत गटबाजी, स्थानिक परिसरातील जातीय व सामाजिक गणित, तसेच मतदारांच्या भूमिकेवरच या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारांच्या हालचाली, संभाव्य आघाड्या आणि विरोधी गटातील तणावामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शहरात सध्या चर्चांना आणि गाठीभेटींना वेग आला असून, कोणत्या उमेदवाराकडे कोण झुकते माप देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक सुत्रांच्या माहितीनुसार, अर्ज छाननीनंतरच खरा उत्साह शिगेला पोहोचेल, असेही बोलले जात आहे.आगामी काही दिवस निर्णायक ठरणार असून राजकीय वातावरणात आणखी रंगत वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.




