श्रीरामपूर (प्रतिनिधी) – मुंबईत भेटण्यासाठी आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत जाऊ नये हा मंत्र आपल्या राजकीय प्रवासात जपणारे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची कार्यशैली आज महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री, राज्याच्या कारभाराचा ताण कितीही असला तरी शिवसैनिकांची काळजी घेण्याचे त्यांनी कधीही विसरलेले नाही. ठाकरे शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांना गुवाहाटीला घेऊन जाण्याच्या ऐतिहासिक घटनेनंतर, महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात एकनाथ शिंदे हे नाव गाजले. त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांनी आणि जनतेशी असलेल्या सखोल नात्यामुळे आज ते प्रत्येक लाडक्या बहिणीचे “भाऊ”, रुग्णांना मदतीचा हात देणारे “नाथ” आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचे विश्वासाचे ठिकाण बनले आहेत. मंत्रालयात दिवसभर राज्याचा कारभार सांभाळून, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांना वेळ देणारे नेतृत्व महाराष्ट्राने याआधी फार कमी पाहिले आहे.
मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरत आहेत. लाडकी बहीण योजना ही त्यांचीच सुपीक कल्पना होती. महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोलाची ठरली. विरोधकांनी या योजनेवर टीकेची झोड उठवली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीतून आणि लाभार्थींच्या आनंदातून या योजनेने यश मिळवले. राजकीय पातळीवरही या योजनेने विरोधकांचा सुफडा साफ करण्यास हातभार लावला.
श्रीरामपूरातील राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष व शिवसैनिक सागर बेग हे नगरपालिकेच्या निवडणुकीसह काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी खास मुंबईत गेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षीय धोरण, निवडणुकीतील रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, राज्याच्या कारभाराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे दिवसभर त्यांना भेटता आले नाही. मंत्रालयातील बैठका, प्रशासकीय आढावे आणि राजकीय कार्यक्रमांचा ताण सांभाळूनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या शिवसैनिकाचा सन्मान राखत एक वेगळाच निर्णय घेतला. दिवसभर भेट होऊ न शकल्याने, मध्यरात्री साधारण तीन वाजता एकनाथ शिंदे यांनी सागर बेग यांना स्वतःच्या राहत्या घरी बोलावले. जवळपास एक तास त्यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत नगरपालिकेची निवडणूक, पक्षाची आगामी रणनीती, स्थानिक संघटन बळकटी, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि विकासकामांच्या मागण्या यांवर तपशीलवार चर्चा झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ ऐकूनच घेतले नाही तर ठोस मार्गदर्शनही केले. “शिवसैनिक हा माझा कुटुंबाचा भाग आहे” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला.
राजकारणात पद, पैसा किंवा सत्ता यापेक्षा नात्यांचे मूल्य जपणारे नेते फारच थोडे असतात. एकनाथ शिंदे हे त्या अपवादात्मक नेत्यांपैकी एक आहेत. गुवाहाटी प्रकरणानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, परंतु त्यांनी स्वतःला “शिवसैनिकांचा नेता” म्हणून सिद्ध करण्यासाठी सातत्याने कार्य केले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शिवसैनिक सांगतात की, “आपल्या नेत्याला भेटायला गेल्यावर आम्ही कधीही निराश परत येत नाही. वेळ कोणतीही असो, परिस्थिती कशीही असो, एकनाथजी शिंदे आमच्यासाठी वेळ काढतात.”
सागर बेग आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ही मध्यरात्रीची भेट केवळ औपचारिक नव्हती. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. श्रीरामपूर शहरात भाजप-शिंदे गटाच्या वाढत्या उपस्थितीच्या दृष्टीने या भेटीचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनमिळावू स्वभावामुळेच ते विरोधकांमध्येही लोकप्रिय आहेत. राजकीय वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्या साधेपणाने आणि जिव्हाळ्याच्या वागणुकीने त्यांनी विरोधकांच्या मनातही आपले स्थान निर्माण केले आहे. कार्यकर्त्यांना, जनतेला आणि सर्वसामान्य नागरिकांना सन्मान देणारे त्यांचे धोरण त्यांना वेगळे ओळख देते.
या भेटीतून श्रीरामपूरातील कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे पक्षाच्या नेतृत्वाकडून स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल आणि येत्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाला बळ मिळेल. सागर बेग यांच्याशी झालेल्या चर्चेतील काही मार्गदर्शक मुद्दे आगामी दिवसांत प्रत्यक्ष कृतीत उतरतील, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट केवळ एका कार्यकर्त्याच्या समाधानासाठी नव्हे, तर सर्वसामान्य शिवसैनिकांचा आत्मविश्वास दृढ करणारी ठरली आहे. मध्यरात्री तीन वाजता घेतलेला हा निर्णय, कार्यकर्त्यांच्या नात्याचा सन्मान राखणारा आणि “नेता” व “शिवसैनिक” यांच्यातील बंध अधिक घट्ट करणारा ठरला आहे. राजकीय दृष्टिकोनातून आणि मानवी नात्यांच्या पातळीवर, ही भेट महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या इतिहासात एक विशेष नोंद बनून राहील.




