श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत नवीन घरकूल फॉर्म भरल्यानंतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या ऑनलाईन पावत्यांचे वितरण दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नगरसेवक मा. दिपक बाळासाहेब चव्हाण व नगरसेविका मा. सौ. वैशाली दिपक चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष नितिनजी दिनकर यांच्या हस्ते झाले.
त्यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्री आवास योजना ही सामान्य, गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदान ठरत असल्याचे नमूद केले. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या निवासाच्या हक्कामुळे त्यांच्या जीवनशैलीत स्थैर्य, सुरक्षितता व आत्मविश्वास निर्माण होत असून, ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता त्यांच्या भविष्याचा आधार ठरत आहे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य राबविण्यात आली होती. लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता घरकूल फॉर्म भरून घेण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले होते. पावती वितरणावेळी वातावरण आनंददायी व सकारात्मक होते.या उपक्रमामागे नगरसेवक दिपक चव्हाण व नगरसेविका वैशाली चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी आपल्या प्रयत्नातून गरजूंना योजनेंतर्गत समाविष्ट करून दिले. त्यांच्या कार्यपद्धतीचे नितीन दिनकर यांच्या कडून विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. नितिनजी दिनकर उत्तर यांनी चव्हाण दाम्पत्याची प्रशंसा करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही जोडी कोणत्याही पदासाठी कार्य करत नाही, तर केवळ गोरगरिबांच्या हितासाठीच सातत्याने झटत आहे.”ते पुढे म्हणाले, “या योजनेंतर्गत अधिकाधिक लाभार्थ्यांना घरे मिळावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, तसेच जे कोणी या योजनेच्या निकषांमध्ये सध्या येत नाहीत, त्यांनाही नियमांनुसार सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रमाच्या आभार भाषणाच्या निमित्ताने नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी सांगितले की, “आम्ही सातत्याने गरजूंना या योजनेंतर्गत घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्या साठी पुढील काळातही असे उपक्रम नियमितपणे राबविले जातील.” या उपक्रमामुळे घराच्या स्वप्नात रमलेल्या शेकडो कुटुंबांना आशेचा किरण मिळाला असून, तो त्यांच्या आयुष्यात स्थायित्व, सुरक्षितता आणि विकास घेऊन येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हाच उपक्रम सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरत असून, चव्हाण दाम्पत्याच्या प्रामाणिक आणि निःस्वार्थी कार्यामुळे त्यांच्या कार्याची जनमानसात पोहोच अधिक दृढ झाली आहे.
याप्रसंगी किरण उईके, नवनाथ पवार, शहराध्यक्ष हंसराज बत्रा, किरण कर्नावट किरण पठारे, पृथ्वीराज चव्हाण, अवधूत शिंदे, तुषार परदेशी, शंकर चव्हाण, राहुल फुलारे, व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते