श्रीरामपूर (प्रतिनिधी) :– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीरामपूर शहरात प्रबोधनात्मक आणि परिवर्तनवादी बुद्ध-भीम गीतांचा भव्य आणि सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ, श्रीरामपूर येथे सायंकाळी सात वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्रभर गाजलेली गायक मंडळी – नरेश कुमार (जयभीमवाल्या पोरांचा नाद खुळा फेम), नितीन कुमार (मुंबई – चमकते सोन्याची जेजुरी/बर्थडे करायचा भावाचा फेम), विजय कुमार, पल्लवी व पूनम हे आपल्या सुमधुर आवाजात भीमसुर्य क्रांतीची गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन कवी सुभाषदादा त्रिभुवन यांनी केले असून ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
बुद्ध, भीम व परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या गीतांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा जागर निर्माण केला आहे. प्रबोधनात्मक गीतांच्या माध्यमातून समाजात एकता, समता आणि बंधुता यांचे मूल्य रूजविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमात विविध भीमगीतांनी वातावरण भारले जाईल व प्रेक्षकांना प्रेरणादायी ऊर्जा मिळणार आहे. श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.