श्रीरामपुर (प्रतिनिधी) – नेवासा येथील साई सेवा हॉस्पीटलमध्ये गर्भपिशवीच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलेल्या रेश्मा शामू ईरले (वय – ३५) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामध्ये हॉस्पिटलमधील डॉ. त्रिभुवन व भुलतज्ञ डॉ. चावरे यांच्या गंभीर हलगर्जीपणामुळेच रेश्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत श्रीरामपूर तालुका वडार समाजाने दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेश्मा ईरले यांना १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान साई सेवा हॉस्पिटल, नेवासा येथे गर्भपिशवी ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी २१ एप्रिलला ऑपरेशन करण्याचे सांगितले होते. मात्र, नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अचानक ऑपरेशन घेण्यात आले. यावेळी डॉ. त्रिभुवन यांनी भुलतज्ञ डॉ. चावरे यांना बोलावून घेतले आणि भूल दिली. रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, भूल दिली असताना ओव्हरडोस झाल्यामुळे रेश्मा ईरले यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.
प्रकरण बिघडल्याचे लक्षात येताच, रुग्णाच्या पतीकडून तातडीने सह्या घेत सुरभी हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु रुग्णाला सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करताच डॉक्टरांनी तातडीने व्हेंटिलेटर लावला आणि नातेवाईकांना ती जिवंत असल्याचे भासविण्यात आले. रात्री १२ वाजता मात्र तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. नातेवाईकांचा आरोप आहे की, प्रत्यक्षात तिचा मृत्यू नेवासा येथील हॉस्पिटलमध्येच झाला होता. या प्रकरणावर विश्वास नसल्याने नातेवाईकांनी रेश्मा ईरले यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये केले.
या गंभीर प्रकारानंतर श्रीरामपूर तालुका वडार समाजाचे पदाधिकारी माजी नगरसेवक दीपक चव्हाण, माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मा. अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे निवेदन दिले. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. अन्यथा वडार समाज संघटनेमार्फत आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये रितेश दत्तू धोत्रे, मच्छिंद्र आण्णा धोत्रे, रामदास धोत्रे, विशाल धोत्रे, सागर म्हस्के, कैलास म्हस्के, गोरख धोत्रे, सुरज धोत्रे, अनिल धनवटे, नवनाथ धोत्रे, राहुल फुलारे, आदित्य वाघ, अमोल पवार, अक्षय धनवटे, सुरेश धोत्रे, सचिन धोत्रे, किरण उईके, श्याम म्हस्के, पांडू व्यवहारे, योगेश धोत्रे यांचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारले जाईल, अशी स्पष्ट भूमिका वडार समाजाने घेतली आहे.