श्रीरामपूर (प्रतिनिधी) : वक्फ बोर्डाच्या विरोधात महाराष्ट्रातून सर्वप्रथम आवाज उठवणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघ या संघटनेची नवी शाखा माळवडगाव येथे सुरू करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी स्पष्ट केले की, संघ स्थापनेमागील उद्देश राजकीय नसून, हिंदूंमध्ये एकता निर्माण करणे व हिंदूंवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांविरोधात संघटीतपणे आवाज उठवणे हा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर “गाव तेथे शाखा” या संकल्पनेनुसार, माळवडगाव येथे राष्ट्रीय श्रीराम संघाच्या शाखेचे उद्घाटन पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक नानासाहेब आसने व बाळासाहेब हुरुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन करून करण्यात आले. यावेळी बेग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सत्कार सोहळ्यात बेग म्हणाले की, “गावागावात अनेक राजकीय पक्ष कार्यरत आहेत, मात्र बहुतेक पक्षांचे धर्मनिरपेक्षतेचे ढोंग हे केवळ मतांसाठी आहे. त्यामुळे हिंदूंवरील अन्यायाकडे हे पक्ष दुर्लक्ष करतात. काँग्रेसच्या धोरणामुळे वाद गावातच मिटवण्याच्या नावाखाली हिंदूंच्या समस्या दडपल्या जातात आणि या ‘गांधीवादी अहिंसात्मक प्रवृत्तीमुळे’ जिहादी शक्तींना बळ मिळाले आहे.” तसेच ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रीय श्रीराम संघाची स्थापना गावोगावी करून, हिंदूंमध्ये जागृती निर्माण करणे आणि सनातन विचार सर्वसामान्य हिंदूपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य हेतू आहे. वक्फ बोर्डाच्या विरोधात संसदेत पास झालेल्या विधेयकाच्या विरोधात काही जिहादी गटांनी दंगली घडवल्या असल्या तरी, त्याविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”बेग यांनी स्पष्ट केले की, “वक्फ कायदा रद्द करा” ही मागणी महाराष्ट्रात सर्वप्रथम सोनई येथील राष्ट्रीय श्रीराम संघाच्या जाहीर धर्मसभेत करण्यात आली होती. “वक्फ कायदा नेमका काय आहे हे देखील अनेक हिंदूंना माहीत नव्हते, ही मोठी शोकांतिका आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुठेवडगावपासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. माळवडगाव येथे मुख्य स्थळी पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने सागर बेग व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत झाले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये नानासाहेब आसने, बाळासाहेब हुरुळे, दिलीप हुरुळे, संजय खताळ, बाळासाहेब खताळ, सदाशिव आसने, दादासाहेब आसने, उपसरपंच शाम आसने, डॉ. गोकुळ मुठे, रामेश्वर मुठे, रावसाहेब आढाव, नाथा मामा दळे, अशोक आसने, देवराज आसने, मारुती जंगले यांचा समावेश होता. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार रवी आसने, संदीप आसने, मयूर पिंपळे, शाखा अध्यक्ष रवींद्र आसने, उपाध्यक्ष मिनीनाथ थोरात, सचिव चेतन आसने, खजिनदार राहुल कावरे, अरुण आसने, दीपक आसने आदींनी विशेष मेहनत घेतली.