श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच दीपाली फरगडे यांच्या पती प्रविण फरगडे यांच्याकडून प्रशासनात सर्रास हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य वसंत देवकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, प्रविण फरगडे हे कोणतेही अधिकृत पद न भूषवता ग्रामपंचायतीच्या कामकाजात सक्रीय सहभाग घेत आहेत. गावातील विविध शासकीय योजना, निधी वितरण, बैठकीतील निर्णय प्रक्रिया यामध्ये ते थेट हस्तक्षेप करतात, तसेच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात. इतकेच नव्हे तर बैठकींना बिनधास्त उपस्थित राहून अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करीत आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार, सरपंच हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले पद असून, त्याच्या अधिकारक्षेत्रात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. असे वर्तन ग्रामपंचायतीच्या स्वायत्ततेला आणि स्वराज्याच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारे आहे, असे देवकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, तसेच श्रीरामपूर पोलीस निरीक्षक यांच्याकडेही तक्रारीची प्रत पाठवली आहे. ग्रामपंचायतीचे स्वायत्त प्रशासन सुरळीत राहावे यासाठी तातडीने योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सदर तक्रारीमुळे भैरवनाथनगर ग्रामपंचायतीमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील कार्यवाही होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.