श्रीरामपूर, प्रतिनिधी :– गोंधवणी येथील तलाव क्रमांक २ मध्ये सुरू असलेल्या तलाव खोदकामाच्या ठिकाणी भराव खचल्याने भैरवनाथ नगर परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे कच्चे रस्ते व बांधही वाहून गेले.
या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “सदर ठिकाणी जुन्या पाझर तलावाच्या जागेत नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र, शहराला पुरेसा पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी जुन्या तलावातील पाणी साठवणे गरजेचे होते. त्यामुळे संपूर्ण तलाव रिकामा करण्याऐवजी त्याच्या अर्ध्या भागात भराव टाकून तिथे पाणी साठवण्यात आले आणि उर्वरित भागात खोदकाम सुरू करण्यात आले.

“तथापि, पाण्याचा पाझर असल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून खोदकाम थांबले होते. घोलप म्हणाले की, “जर संपूर्ण तलाव रिकामा करून काम केले असते, तर श्रीरामपूर शहराला दर महिन्याला किमान दहा दिवसांची पाणीटंचाई भोगावी लागली असती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठीच अर्धा तलाव रिकामा ठेवून काम सुरू करण्यात आले होते. दुर्दैवाने भराव फुटल्याने शहराला पुरेसा पुरवठा करणारे सुमारे आठ दिवसांचे पाणी वाया गेले.
“या घटनेनंतर शहरात पाणी कपात करावी लागणार असून, कॅनॉलचे पाणी रोटेशनने उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही घोलप यांनी यावेळी केले. रोटेशनसाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच निर्णय होईल आणि नियमित पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चौकट
“तलाव फुटल्यानंतर आमच्या शेतात पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे पंचनाम्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे, शासनाने वेळीच पावले उचलावीत.”– दिपाली फरगडे, सरपंच, भैरवनाथ ग्रामपंचायत