श्रीरामपूर (प्रतिनिधी): अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था, श्रीरामपूर आणि आधार दिव्यांग संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. २८ एप्रिल) रोजी दिव्यांग भवन कार्यालयात दिव्यांगांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दिव्यांगांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक, राज्याध्यक्ष आणि प्रहार जनसेवक लक्ष्मण खडके यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना दिव्यांगांच्या राजकीय हक्कांवर ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “राजकीय क्षेत्रात दिव्यांग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सहभागाशिवाय खरी लोकशाही अपूर्ण आहे. दिव्यांगांचे मतदान दर हे लक्षवेधी असून, श्रीरामपूर विधानसभा व लोकसभा क्षेत्रात एखाद्या उमेदवाराच्या विजयात निर्णायक भूमिका बजावू शकतात.
“खडके यांनी स्पष्ट केले की, दिव्यांगांच्या कल्याणासाठी बच्चुभाऊ कडू साहेब यांच्याव्यतिरिक्त कोणीही ठोस प्रयत्न करत नसल्याचे दुःखद वास्तव आहे. “इतर नेते दिव्यांगांना केवळ वोटबँक म्हणूनच पाहतात,” अशी टीका त्यांनी केली. दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभेपर्यंत राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यामुळे दिव्यांगांना न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनंतरही दिव्यांगांचे जीवन आजही दुर्लक्षित व आर्थिक अडचणींमध्ये अडकलेले आहे, ही एक मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत दिव्यांगांसाठी महत्त्वाच्या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये दिव्यांग घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेल्वे स्थानकावरील आणि डब्यांतील सुविधा, एस. टी. बसमधील आरक्षित जागा, मुख्य प्रशासकीय इमारतीतील रॅम्प आणि लिफ्ट सुविधा, घरफाळा सवलत, ५% राखीव निधी वाटप, दिव्यांग विवाह योजनांचा समावेश होता. बैठकीला पीआरओ राम डमाळे, विष्णुपंत पाठक, रविंद्र करपे, सुमित रहीले, भिकाजी जाधव यांच्यासह तालुक्यातील अनेक दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.