श्रीरामपूर/प्रतिनिधी :– तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळासाठी सरपंच पदाच्या आरक्षणांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आरक्षण सोडतीने अनेक इच्छुकांची मने जिंकली, तर काहींच्या आशा धुळीला मिळाल्या. ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशा संमिश्र भावना यावेळी अनुभवायला मिळाल्या.
या आरक्षण प्रक्रियेमध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दत्तनगर ग्रामपंचायत. २००७ साली स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीत गेली दोन दशके माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता टिकवून ठेवली होती. मात्र यावेळेस अनुसूचित जाती महिला/पुरुष आरक्षण पडल्याने या ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. दोन दशकांपासून एकाच पक्षाची सत्ता असली तरी सरपंचपदासाठी पुनरावृत्ती होऊ दिलेली नाही. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठीदेखील इच्छुकांना मोठी कसरत करावी लागत आहे. आजवर सरपंचपद भूषवलेले अनेक नेते आता बाजूला राहिल्याचे चित्र आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नानासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक व राजकीय उपक्रम राबवले जात असून, यामध्ये शेती महामंडळाच्या १५ एकर जमिनीवर जलजीवन मिशनअंतर्गत २९ कोटींचा निधी, शेकडो मागासवर्गीयांसाठी घरकुलांचे उद्घाटन, बाळू मामांचे धार्मिक कार्यक्रम, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त महिलांसाठी पैठणी खेळ यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम जंत्री जनसेवा मंडळाच्या माध्यमातून नियमितपणे राबवले जात आहेत.
याच दरम्यान विरोधी पक्ष मात्र गप्प असून, त्यांची कुठलीही ठोस हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच नव्याने वर्चस्व स्थापनेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. दत्तनगर ग्रामपंचायतीची सत्ता आता काठावर आल्याने अनेक विद्यमान सदस्यांनी सत्तेच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता ग्रामस्थांच्या चर्चांमधून व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, दत्तनगरमध्ये सत्तेच्या संघर्षाला सुरुवात झाली असून, भविष्यातील वाटचाल सत्ताधाऱ्यांसाठी खडतर ठरणार हे निश्चित आहे.