श्रीरामपुर/प्रतिनिधी:– तालुक्यातील राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या दत्तनगर गट व गणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या भागात आता भाजपसह इतर पक्षही मोर्चेबांधणीस सुरुवात करत असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.गेल्या काही वर्षांत माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि काँग्रेसचे करण ससाणे यांच्यातील अटीतटीच्या लढतींमुळे या गटातील राजकारण अधिकच तापले आहे. मतदारांचे कल हेच लढतीचे यश किंवा अपयश ठरवत असल्याने प्रत्येक गट आणि पक्षाची रणनीती अत्यंत काटेकोरपणे आखली जात आहे. भाजपनेही ससाणे गटाच्या संभाव्य पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढवल्या आहेत.
विशेष म्हणजे, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपली पकड मजबूत करण्यासाठी मोर्चा वळवला असून, या घडामोडींमुळे दत्तनगर गटात राजकीय रंगत वाढली आहे.दत्तनगर गटात ब्राम्हणगाव वेताळ, भैरवनाथनगर, दिघी, खंडाळा, दत्तनगर, उक्कलगाव, कडीत, मांडवे, फत्त्याबाद, कुरणपूर, एकलहरे, गळनिंब ही गावे येतात. या भागात जागांचे आरक्षण अद्याप न ठरल्याने अनेक इच्छुकांनी आतापासूनच प्रचाराची आणि जनसंपर्काची तयारी सुरू केली आहे. सर्वसाधारण जागा असल्यास बाबासाहेब दिघे, नानासाहेब शिंदे, गणेश मुदगुले, प्रवीण फरगडे आदींची नावे चर्चेत आहेत. तर आरक्षण लागू झाल्यास पी. एस. निकम, सुनील शिरसाठ, संदीप मगर, अशोक लोंढे, भिमा बागुल, सागर भोसले आदींची नावे पुढे येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही स्थितीत गटातील अंतर्गत स्पर्धा टाळता येणार नाही, हे स्पष्ट आहे.दरम्यान, काँग्रेसचे मजबूत नेतृत्व करणाऱ्या ससाणे गटामध्ये देखील काही नाराजीची चिन्हं दिसून येत आहेत. दत्तनगर ग्रामपंचायतीतील काही सदस्य ससाणे गटाच्या निर्णयांवर नाराज असून, ते भाजपकडे झुकण्याची शक्यता आहे. नानासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून भाजपकडे या सदस्यांची ओढ दिसत आहे. त्यामुळे ससाणे गटाचा पवित्रा भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो.
या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर सध्या खासदार डॉ. सुजय विखे यांचे दत्तनगरमध्ये वाढते लक्षही लक्षवेधी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या हस्ते 101 घरकुल योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खेळ पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली, यावरून भाजपचा जनसंपर्क वाढवण्यावर भर असल्याचे दिसून येते.एकूणच, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासाठी दत्तनगर गट ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. काँग्रेसला बालेकिल्ला राखायचा आहे, तर भाजपला येथे मजबूत पाय रोवायचा आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार युद्धपातळीवर रंगण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मतदारांचा कल, स्थानिक असंतोष, अंतर्गत गटबाजी आणि पक्षीय आघाड्या यामुळे ही निवडणूक अत्यंत नाट्यमय आणि घडामोडींनी भरलेली ठरेल, हे निश्चित.