श्रीरामपूर – शहरातील दत्तनगर भागातील गोरगरीब व भूमिहीन नागरिकांसाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठत आज प्रधानमंत्री आवास योजना फेज-१ अंतर्गत १०१ घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन दिमाखात पार पडले. सकाळी ९:३० वाजता शुभम मंगल कार्यालय शेजारी झालेल्या या कार्यक्रमाचे भूमिपूजन खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा जनसेवा मंडळ व नाना शिंदे मित्र मंडळ यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. उपस्थित मान्यवरांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर, तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे, मा. सभापती नाना शिंदे, मा. सरपंच सुनिल शिरसाठ आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, मार्केट कमिटी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच सारिका कुंकलोळ, प्रेमचंद कुंकूलोळ, मार्केट कमिटी सभापती नानासाहेब पवार, जिल्हा परिषद सभापती शरदराव नवले, विभागीय जिल्हाप्रमुख भिमाभाऊ बागुल, माजी पंचायत समिती सभापती संगीताताई शिंदे, उपसरपंच कुसुमबाई जगताप, ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
दत्तनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून झाला. त्यांनी गावठाण मंजुरी करून या योजनेची मजबूत पायाभरणी केली होती. या योजनेअंतर्गत १५ एकर क्षेत्रावर एकूण ६५० घरकुलांची उभारणी होणार असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून १०१ घरकुलांचे भूमिपूजन आज पार पडले. हा दिवस दत्तनगरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सामाजिक ऐक्य, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज व गुन्हेगारीविरोधी उपाययोजनांवर भर दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गुन्हेगारांचा धर्म नसतो. कोणतीही दुर्बलता न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.” महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी शासन तसेच समाज पातळीवर कठोर पावले उचलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या सोहळ्यात त्यांनी एकतेचा आणि सहकार्याचा संदेश देत, “कार्यक्रमात काहींची नावे उच्चारली नसली तरी त्यांच्याविषयी मनात सन्मान आहे,” असे नम्रपणे सांगितले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आणि आपल्या हक्कासाठी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दांत राजकारणाची दिशा ठरवणारे विचार मांडले. “राजकारण छोट्या गोष्टीवर न होता, गरिबांना घर, शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षण मिळाले पाहिजे. श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल,” असे ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेण्यात आल्याचा विशेष आनंद देखील त्यांनी बोलताना व्यक्त केला. डॉ. विखेंनी जाहीर केले की, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीरामपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६०० नवीन घरकुलं मंजूर झाली असून, ही घरं सोलर सिस्टिमसह उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दत्तनगर हे एकत्रित केंद्र असणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला “थारा” नव्हे, “धक्का” असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, खंडणी व महिलांवरील अत्याचार यावर भाष्य करताना डॉ. विखे म्हणाले, कोणताही समाज असो, गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन देणार नाही. अशांना उखडून फेकलं जाईल. श्रीरामपूरच्या कायदा व सुव्यवस्थेवर कठोर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, महामानवांच्या जयंतीत डीजे किंवा अनावश्यक खर्च न करता आरोग्य शिबिर, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले पाहिजे. विचारांशी नातं जोडण्याचा खरा मार्ग तोच आहे. जनतेची कामं करा, जनता आपल्याला नेता बनवते. त्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसते, असा मार्मिक सल्ला देखील सुजय विखेंनी संभाव्य नगरसेवकांना दिला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ही फक्त सुरुवात आहे, श्रीरामपूरला आता मी वारंवार भेट देणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक दृष्टीने काम करूया, असं देखील मत मांडून विकासाला प्राधान्य देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
गावच्या सरपंच सारिका कुंकलोळ यांनी आपल्या भाषणात दत्तनगरसाठी ही घरकुल योजना फक्त घरांचे बांधकाम नसून ती गावाच्या समृद्धीचा पाया असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांचे विशेष आभार मानले आणि या प्रकल्पामुळे गावातील भूमिहीन आणि गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी खासदार सुजय विखे यांनी दिलेला सामाजिक संदेश सर्वांच्या मनात ठसणारा ठरला – “आपण फुटलो तर नुकसान आपलेच आहे. समाजाच्या एकतेसाठी आणि पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याकरिता आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे.” या भूमिपूजन सोहळ्यामुळे दत्तनगरमधील अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांमुळे अनेक गोरगरीब कुटुंबांचे हक्काचे स्वप्न साकार होणार आहे. गावात उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकल्प गावाच्या विकासासाठी एक उज्ज्वल वळण ठरणार आहे.
याप्रसंगी भाजपा नेते गणेश राठी, मारुती बिंगले, मा नगरसेवक रवी पाटील, जितेंद्र छाजेड, केतन खोरे, शहराध्यक्ष हंसराज बत्रा, बंडूकुमार शिंदे, अक्षय गाडेकर, मोहन आव्हाड, रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष विजय पवार, संदीप मगर, सुरेश जगताप, रूपेश हरकल, सतिष सौदागर, भैया भिसे, संदीप बागुल, प्रदीप गायकवाड, सुधीर ब्राह्मणे, राजू खाजेकर, राजु मगर, संजय बोरगे यांच्या सह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच दत्तनगर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
गावातील राजकारणाला एक वेगळं वळण देणारी घटना नुकतीच समोर आली आहे. काँग्रेस गटाचे सरपंच भाजपा ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टेजवर दिसून आल्याने गावात आणि परिसरात कुजबूज सुरू झाली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात हलचल निर्माण केली असून, संबंधित सरपंच पक्षांतर करणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. या कार्यक्रमात भाजपचे खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामुळे भाजपाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंचांचा स्टेजवरील सहभाग अनपेक्षित असल्यामुळे काँग्रेस समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे, भाजप समर्थकांकडून याला ‘राजकीय पाठिंबा’ म्हणून दाखवले जात आहे.