श्रीरामपुर:– शहरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समिती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात समाजहितासाठी कार्य करणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांना भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांना त्यागमूर्ती माता रमाई समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एकता समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुष्पगुच्छ, फेटा आणि सन्मानचिन्ह प्रदान करून हा सन्मान अधिक गौरवशाली करण्यात आला. कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणात भीम सूर्य क्रांतीचा समाजप्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रभर ख्याती असलेल्या शाहीर नितीन बनसोडे, नरेश बडेकर, पल्लवी खरात, पूनम कदम यांच्यासह कलाकारांनी सादर केलेल्या भीमगीतांनी संपूर्ण वातावरणात ऊर्जा निर्माण केली आणि उपस्थितांचे मन जिंकले.
यावेळी राहुल डंबाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, श्रीरामपूर शहरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास कोणतीही तांत्रिक अडचण नाही. हा पुतळा शहराच्या वैभवात भर घालेल. जर गरज भासली तर पुतळा उभारणीसाठी मोठे आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. त्यांनी सुभाष त्रिभुवन यांच्या संघर्षाचेही विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास चरण त्रिभुवन, सुमेध पडवळ, संघराज त्रिभुवन, बाळासाहेब बागुल, हनीफ पठाण, सुनील मगर, अंबादास निकाळजे, बाबासाहेब पवार, अर्जुन शेजवळ, शिवा साठे, पी.एस. निकम, रवींद्र गायकवाड, किशोर ठोकळ, रॉकी लोंढे, रज्जाक पठाण, एजाज पठाण, राकेश थोरात, भारत त्रिभुवन, वसंत साळवे, सतीश त्रिभुवन, मिलिंद धीवर, सुरेश शेळके, अशोक दिवे, संतोष त्रिभुवन तसेच महिला आघाडीच्या रमाताई धिवर सुशीलाताई त्रिभुवन, ॲड. सोनाली त्रिभुवन, कांताबाई जाधव, आशाबाई रुद्राक्ष, बुद्धप्रिया त्रिभुवन, संगीताताई गायकवाड, प्राजक्ता त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरण सोहळा न राहता, समाजप्रबोधन, सामाजिक एकतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव ठरला.