श्रीरामपूर (प्रतिनिधी): मतदारसंघातील नागरिकांच्या शासन दरबारी रखडलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर येथील शासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित केलेली आमसभा मोठ्या उत्साहात पार पडली. महसूल, पोलीस, नगरपालिका, महावितरण, उप प्रादेशिक परिवहन आदी महत्त्वाच्या शासकीय विभागांचे अधिकारी या सभेत उपस्थित होते.
या वेळी नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. काही समस्या मूलभूत स्वरूपाच्या तर काही दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या होत्या. नागरिकांच्या थेट मांडणीमुळे वातावरण तापले आणि आमदार ओगले यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत स्पष्ट शब्दांत सज्जड दम दिला.
आमदार ओगले म्हणाले, “आपण जनतेचे सेवक आहोत हे भान ठेवून काम केले पाहिजे. जर ते केले नाही, तर गाठ माझ्याशी आहे. प्रलंबित कामांबाबत नागरिकांची दिशाभूल सहन केली जाणार नाही”. या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ चांगलीच खळबळ उडाली. या सज्जड इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांवर योग्य कामाचा दबाव निर्माण झाला आहे. उपस्थित नागरिकांनीही आमदार ओगले यांच्या भूमिकेला दाद दिली. मात्र नागरिकांच्या समस्या कितपत आणि किती लवकर सोडवल्या जातील, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
या आमसभेला प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नगरपालिका मुख्यधिकारी मच्छिन्द्र घोलप, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले, माजी उपनगराध्यक्ष मुज्जफर शेख, माजी नगरसेवक अण्णासाहेब डावखर, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, बाजार समितीचे सभापती शरद नवले, शिवसेनेचे सचिन बडदे, अशोक बागुल, काका बोरकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार ओगले यांच्या थेट इशाऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली असून, नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा मतदारसंघात व्यक्त केली जात आहे.




