श्रीरामपूर : गेल्या चार दशके विविध आंदोलनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपूर येथील शिवाजी चौकातच बसवावा, या मागणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या पुतळ्यासाठी अनेक वर्षांपासून दहा हजार रुपये प्रतिमहिना शास्ती देखील नगरपालिका प्रशासनाकडे भरली जात आहे. तथापि, अद्यापही पुतळा स्थापित न झाल्याने नागरिकांत संतापाची भावना वाढली आहे.
सुरुवातीला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मंडईसमोर किंवा अन्य ठिकाणी पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत तो निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. नंतर केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यावर, आंदोलनांचा मार्ग टाळून, थेट मंत्र्यांकडे व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसवला जाईल, अशी ठोस आश्वासने देण्यात आली होती.
मात्र सध्या प्रशासनाने पुन्हा मंडईसमोरील जागेवरच पुतळ्याचे भूमिपूजन करण्याची हालचाल सुरू केली आहे, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीने तीव्र निषेध नोंदवला आहे. श्री. बाबासाहेब शिंदे, श्री. प्रवीण फरगडे, आणि डॉ. दिलीप शिरसाट यांनी संयुक्तपणे सांगितले की, मंडईसमोर पुतळा बसविण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. जर शिवाजी चौकातच पुतळा बसविला गेला तर आम्ही प्रशासनाचा सत्कार करू, परंतु तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनात सर्व शिवप्रेमी, नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शहर आणि तालुक्यातील इतर नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले असल्याने सर्व काही एकतर्फीपणे घडते आहे, याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.